उद्या (दि. २१ ऑक्टोबर) होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांवर रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे सावट आले आहे.
जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. काल दिवसभर जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने संततधार धरली होती. निवडणुकीच्या जाहीर प्रचाराच्या अखेरच्या दिवशी पाऊस पडल्याने उमेदवारांना जाहीर प्रचार लवकर आटोपता घ्यावा लागला. आज सकाळी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. संगमेश्वरमध्ये सर्वाधिक ४८, तर गुहागर तालुक्यात सर्वांत कमी म्हणजे १० मिलिमीटर पाऊस पडला. मंडणगड आणि दापोलीत प्रत्येकी ४५, खेडमध्ये १५, चिपळूणला ३१, रत्नागिरी, ११, लांजा २१, तर राजापूर तालुक्यात सरासरी १२ मिलिमीटर पाऊस पडला.
जिल्ह्यात सर्वत्र कालपासूनच पाऊस पडत असल्यामुळे निवडणूक लढविणारे उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते तसेच निवडणूक प्रशासन यंत्रणेलाही अडचणींचा सामना करावा लागला. चिपळूणमध्ये मतपेट्या आणि अन्य साहित्याचे वितरण करण्यासाठी उभारलेल्या मंडपात पावसाने पाणी साचल्याने व्यत्यय निर्माण झाला. आजही ही दिवसभर पाऊस पडत आहे. पावसाचे प्रमाण असेच उद्याही राहिले तर त्याचा मतदानावर परिणाम होऊ शकतो, अशी स्थिती आहे. पावसातून मतदारांना बाहेर काढणे आणि मतदान केंद्रापर्यंत नेणे पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही कठीण होणार आहे.
