परतीच्या पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला. सोमवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. गेल्यी तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात भातशेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसानं अक्षरशः धुमाकाळ घातला आहे. पंचगंगेच्या पातळीत दिवसभरात दोन फुटांची वाढ झाली आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली.
आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्ह्यात गडगडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या चारही जिल्ह्यात आजपासून सलग तीन दिवस जोरदार वाऱ्यासह कडकडाटासह तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात आज तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो.
दरम्यान, संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातील 3 हजार 237 उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. राज्य विधानसभेच्या 288 जागा तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी देखील आज मतदान केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुक यंत्रणा सज्ज झाली असून कडेकोड पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. अनेक दिग्गजांनी सकाळीच आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.
