मुंबई : विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजप आणि शिवसेनेकडून अपक्ष आमदारांना आपल्याकडे खेचण्याची जणू स्पर्धाच रंगली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तास्थापनेची आकडेमोड सुरु आहे. भाजपने 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. मात्र कोणत्याही एका पक्षाला 145 हा सत्तास्थापनेच्या आकडा गाठता आलेलं नाही. शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या, राष्ट्रवादी 54 जागांसह तिसऱ्या, काँग्रेस 44 जागांसह चौथ्या स्थानावर आहे.
असं असताना सेना-भाजपकडून एक-एक अपक्ष आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
शिवसेनेने आतापर्यंत 5 अपक्ष आमदारांना आपल्याकडे खेचलं आहे. त्यामुळे सेनेचं संख्याबळ आता 61 वर पोहोचलं आहे.
नगर जिल्ह्यातील नेवासा मतदारसंघाचे अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिला. अपक्ष आणि बंडखोरांच्या या संख्येमुळे शिवसेनेचे संख्याबळ 61 वर पोहोचलं. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे आमदार शंकरराव गडाख यांना घेऊन सोमवारी विशेष विमानाने मुंबईत मातोश्रीवर दाखल झाले. शंकरराव गडाख हे शरद पवारांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे राष्ट्रवादीला हा धक्का आहे.
भाजपने स्वबळावर सरकार स्थापन करायचं म्हटलं तरी दोन्ही पक्षांच्या युतीशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही, त्यामुळे शिवसेना आणि भाजपने एकत्रित सरकार स्थापन करावे, अशी प्रतिक्रिया शंकरराव गडाख यांनी टीव्ही 9 कडे व्यक्त केली.
शिवसेनेला पाठिंबा दिलेले अपक्ष, बंडखोर आमदार
- रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल
- प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू
- प्रहार संघटनेचे आमदार राजकुमार पटेल
- भंडाराचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर
- नेवासा अपक्ष आमदार शंकरराव गडाख
