रत्नागिरी : ‘आरटीई’च्या 25 टक्के प्रवेशासाठी काढलेल्या राज्यस्तरीय सोडतीत रत्नागिरी जिल्ह्यातील 609 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. प्रवेशाच्या तारखा शिक्षण संचालनालयाकडून संकेतस्थळावरून काढून टाकण्यात आल्या असून, संचारबंदी संपल्यानंतर हा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009नुसार, वंचित गटातील बालकांना व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील बालकांना प्रवेश देण्यात येतो. जिल्ह्यातील 95 शाळांतील 864 जागांसाठी 811 अर्ज पालकांनी भरले होते. त्यातून 609 जणांची निवड करण्यात आली. काढण्यात आलेल्या सोडतीचे प्रवेश घेण्यासाठी शिक्षण संचालनालय सुधारित तारखा जाहीर करणार आहे. कडक निर्बंधामुळे प्रवेशात अडचणी येणार असल्याने हा निर्णय घेतला आहे. आरटीईच्या 25 टक्के प्रवेशासाठी राज्यस्तरीय सोडत गुरुवारी काढण्यात आली. या सोडतीत 67 हजार 553 बालकांना प्रवेश निश्चित करण्यात आले होते. सोडतीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी 30 एप्रिलपर्यंत विभागातील पडताळणी समितीमाफत आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश घ्यावा, असे म्हटले होते. प्रवेशाच्या तारखा शिक्षण संचालनालयाकडून संकेतस्थळावरून काढून टाकण्यात आल्या असून, लॉकडाउन संपल्यानंतर प्रवेशाबाबत संकेतस्थळावर प्रवेशाच्या तारखांबाबत नव्याने सूचना दिल्या जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. निर्बंध असल्याने पडताळणी समितीकडे गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:31 PM 22-Apr-21