लग्नाचे आमिष दाखवून तरुणीच्या आईचे सुमारे २ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करणार्या( मुस्ताक काझी या तरुणासह बानू काझी, आलम पावसकर या तिघांविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील कोकणनगर भागातील अलमिरा इलियास काझी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मुस्ताक ईसा काझी या तरुणासोबत गेल्या १७ ऑक्टोबर रोजी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुस्ताकसोबत असलेल्या बानू काझी आणि आलम पावसकर (रा. केळ्ये) यांनी अलमिरा यांच्या आईला भेटून गहाण ठेवलेले दागिने आम्ही सोडवून घेतो, असे सांगितले. त्यानंतर अलमिरा यांच्या आईने २ लाख ५० हजार रुपये कोकणनगर येथे घरी आणून दिले. अलमिया व मुस्ताक यांनी मुथ्थुट फायनान्समधून दागिने सोडवून घेतले. त्यानंतर ते दागिने घेऊन ते संगमेश्वार येथे गेले. त्यानंतर पुन्हा रत्नागिरीत आले. यावेळी मुस्ताकने दागिने स्वच्छ करून आणतो, असे अलमिरा यांना सांगितले आणि मुस्ताक दागिने घेऊन निघून गेला. मात्र तो परत आलाच नाही.
आपण फसवले गेल्याचे लक्षात आल्यानंतर या तिघांच्या विरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
