पनवेल : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे पनवेल शहरातील गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे नदी शेजारील सिडको वसाहतीत पाणी शिरू लागले आहे. परिस्थितीची खबरदारी घेत सिडकोच्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून दवंडी पेटवून वाढत्या पाणी पातळीची माहिती दिली जात आहे. गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कोकणसह मुंबईमधील जनजीवन पुर्णपणे कोलमडले आहे. पनवेल येथील गाढी नदीपात्रात तर झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे नदीतील पाणी पात्रा बाहेर आले आहे. हे पाणी नदी शेजारी असलेल्या सिडको वसाहती मध्ये शिरू लागले आहे. त्यामुळे सिडको कडून विशेष उपाय योजना राबवल्या जात आहे. नवीन नवीन पनवेल मधील ‘ए’ टाईप मध्ये पाणी शिरू लागल्यामुळे सिडकोच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी दवंडी पिटुन रहिवाश्यांना वाढत्या पाणी पातळीची माहिती दिली जात आहे. तर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याचबरोबर घरातली वीज पुरवठा बंद ठेवून, गरज असेल तरच बाहेर पडण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे. सिडकोच्या या घोषणेमुळे मात्र नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहेतर, मुंबईमध्ये अनेक रेल्वे स्थानकातील रेल्वेरूळ जलमय झाले आहेत. त्यामुळे रेल्वे तसेच लोकल सेवेला याचा फटका बसला आहे. यातच काल, शुक्रवारी (दि.२६) रात्री साडेआठ वाजता मुंबईहून कोल्हापुरकडे रवाना झालेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसच्या काही डब्यांमध्ये बदलापूर-कर्जत मार्गावरील वांगणी रेल्वे स्थानकाजवळ जामटोली येथे पाणी शिरले. त्यामुळे ही रेल्वे थांबविण्यात आली. परिणामी या रेल्वेतील सातशे प्रवाशांना याचा फटका बसला आहे.
