भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आज अखेरचा T- 20 सामना वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी एक-एक सामना जिंकून बरोबरी साधली आहे. यानंतर आजच्या सामन्यात दोन्ही संघांची ‘करो या मरोची’ स्थिती आहे. पहिला T- 20 सामना भारताने जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजनं जबरदस्त पुनरागमन केलं. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाकडून क्षेत्ररक्षणात झालेल्या चुकांचा वेस्ट इंडिज संघाने फायदा घेत सामन्यात आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. पहिल्या T- 20 सामन्यात रोहित शर्मा अपयशी ठरल्यानंतर विराट कोहली, लोकेश राहुल यांच्या जबरदस्त खेळीमुळे भारतीय संघाला विजय प्राप्त झाला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात शिवम दुबे आणि रिषभ पंत यांचा अपवाद वगळता बाकी सर्व फलंदाज अपयशी ठरले होते. दरम्यान, विंडीजची आघाडीची फळी जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यांना रोखण्याचं मोठं आव्हान भारतीय गोलंदाजांपुढं असेल. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार ? याकडं सर्व क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.