मुंबई | राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण यंदाही राष्ट्रपतींच्या हस्ते न झाल्याने ‘धुरळा’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी संताप व्यक्त केला आहे. या मानाच्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी राष्ट्रपतींना तीन तासांसाठी वेळ काढता येत नाही का? असा सवाल समीरने केला आहे.
मागच्या वर्षीपासून हे काय नवीन सुरू झालंय? ‘राष्ट्रपती’पदक द्यायला सन्मानयीय राष्ट्रपतींना 3 तास काढता येत नाहीत? मान्य आहे की, आपल्या देशात राष्ट्रपती खूप व्यस्त असतात पण हे ‘राष्ट्रीय’ पुरस्कार आहेत, याआधीचे सर्व काढतच होते की वेळ. त्यांच्या वेळेनुसारच सगळं आयोजित होतं ना, असं समीरने म्हटलं आहे.
गेल्या वर्षापासून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण हे राष्ट्रपतींऐवजी इतरांच्या हस्ते देण्यात येत आहेत. मागचा 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण तत्कालीन माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं.
दरम्यान, पुरस्कार वितरणाआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार मिळणार नसल्याचं कळताच काही कलाकारांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे अनेक कलाकारांनी नाराजी व्यक्त केली होती.
