रत्नागिरी : नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्बळावर लढले होते. त्यावेळी शिवसेनेला जास्त जागा मिळाल्या, मात्र गेल्या तीन वर्षांत विकासकामेच ठप्प झाल्याचे चित्र शहरात आहे. त्यामुळेच परिर्वतन घडवण्यासाठी सर्व जातीधर्मातील मतदार, तरुणांचा चांगला प्रतिसाद भाजपला मिळत आहे. विकासकामे थांबल्याने सामान्य आणि सुशिक्षित मतदार नाराज आहेत. विकासकामे करणारा आणि सुशिक्षित, प्रशासन चालवणारा उमेदवार भाजपने दिला आहे, असे भाजप महिला आघाडी प्रमुख ऐश्वर्या जठार यांनी सांगितले.
पोटनिवडणुकीत भाजपने उच्चशिक्षित, प्रशासनावर मजबूत पकड असणार्याि दीपक पटवर्धन यांना उमेदवारी दिली. मतदानाची तारीख जवळ येऊ लागल्याने आता भाजपचा प्रत्येक ठिकाणी प्रचार जोरात सुरू आहे. सभांपेक्षा मतदारांच्या घरीदारी जाऊन त्यांना पत्रक दिले जात आहे. घरोघरच्या प्रचारादरम्यान त्या त्या ठिकाणच्या समस्या नागरिक मांडत आहेत.
भाजपचे नगरसेवक असणा-या प्रभागांमध्ये स्थानिक नगरसेवक मेहनत घेत आहेत. भाजपच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली असून दररोज कामाचा आढावा घेतला जात आहे. ही निवडणूक भाजपच्या अस्तित्वासाठी महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे माजी आमदार बाळासाहेब माने यांच्यासमवेत राजश्री शिवलकर, शिल्पा मराठे, दामोदर लोकरे, मुन्ना चवंडे, बिपीन शिवलकर, संकेत बापट, आदित्य जोशी तसेच प्रत्येक प्रभागात अनेक कार्यकर्ते प्रचारात मग्न आहेत.
राजकारणाचे कंगोरे बदलत चालले असताना नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणे ही सांघिक जबाबदारी आहे. त्यामुळे निवडणुकीचे हे आव्हान पेलण्यासाठी क्रियाशील कार्यकर्ते झटत आहेत. तळमळीने आणि अपार उत्साहाने शहराच्या तळागाळात पोहोचले पाहिजे. शहराच्या विकासाचे स्वप्न जनतेपर्यंत नेऊन आव्हानात्मक निवडणूक जिंकू या. त्यातूनच शहराला उत्तम शिस्तबद्ध, पारदर्शक प्रशासन देऊ, असे आवाहन उमेदवार दीपक पटवर्धन यांनी केले आहे.
