देशभरात बेरोजगारीच्या प्रश्नाने उग्र रुप धारण केलेले असताना, रोजगाराबाबत राज्य सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीच्यागृहविभागाने मेगा भरती हाती घेण्याचा निर्णय घेतला असून पोलीस दलातील रिक्त पदे भरण्याच्या प्रयत्नात गृहविभाग आहे. या निर्णयांतर्गत गृह विभाग लवकरच सात ते आठ हजार पदांवर पोलीस भरती करणार आहे. ही माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. या पोलीस भरतीमुळे राज्यातील पोलिसांवरील ताण काही प्रमाणात कमी होणार असल्याची चर्चा आहे.दिवंगत जे.डी. पाटील उपाख्य बाबासाहेब सांगळूदकर यांच्या ५१व्या पुण्यतिथीनिमित्त दर्यापूर येथील श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात गृहमंत्री अनिल देशमुख बोलत होते.कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकार पावले उचलणार आहे. अवैध सावकारी, नक्षलवादाला आळा घालण्यासाठी उपाययोजना आखण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. पोलीस भरतीसह विविध स्पर्धा परिक्षांसाठी ग्रामीण भागातील तरुणांनी अभ्यासात सातत्य ठेवत तयारी करायला हवी असे मतही त्यांनी व्यक्त केले. राज्यातील महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी शासन पावले उचलणार आहे. विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्येबाबत गृहमंत्री देशमुख यांनी चिंता व्यक्त केली. पालकांनी आपल्या मुलांवर अवास्तव अपेक्षांचे ओझे लादू नये असे आवाहन त्यांनी केले.