चक्रीवादळाच्या प्रभावाने मुंबईतील किनार्‍यावर आला होता १५३ मे.टन कचरा

0

मुंबई : तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावाने खवळलेल्या समुद्रातून मुंबईतील सात चौपाट्यांवर चार दिवसांत सुमारे १५३ मेट्रिक टन कचरा किना-यांवर आला होता. संपूर्ण महानगरात स्वच्छतेची नियमित कामे उरकत असताना, या सातही चौपाट्यांवरील कचरादेखील तातडीने हटवून चौपाट्या पूर्ववत स्वच्छ करण्याची कार्यवाही महानगरपालिकेने रात्रंदिवस प्रयत्न करुन पूर्ण केली आहे.

मुंबईमध्ये गिरगांव, दादर, चिंबई, जुहू, वेसावे (वर्सोवा), मढ आणि गोराई या प्रमुख सात चौपाट्या आहेत. या सात चौपाट्यांची मिळून एकूण लांबी ३६.५ किलोमीटर इतकी आहे. देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण स्थळ असणाऱया या सातही चौपाट्यांची नियमितपणे स्वच्छता महानगरपालिकेच्या यंत्रणेकडून करण्यात येते. ही स्वच्छता राखण्यासाठी २४ X ७ तत्त्वावर कार्यरत राहणारी यंत्रणा आवश्यक त्या संयंत्रांसह व मनुष्यबळ तैनात करुन नेमली आहे. यामध्ये चौपाटी स्वच्छता करण्यासाठी विशेष संयंत्रे जोडलेले ट्रॅक्टर, कॉम्पॅक्टर, ट्रॅक्टर ट्रॉली, २४० लीटर क्षमतेचे कचऱयांचे डबे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. किना-यांवर सातत्याने येणारा कचरा नियमितपणे हटवून स्वच्छता ठेण्यासाठी होत असलेल्या विशेष प्रयत्नांमुळे चौपाट्या सदैव स्वच्छ राहत आहेत. समुद्रात खोलवर गेलेला कचरा, समुद्र खवळल्यानंतर विशेषतः पावसाळ्यात उंच लाटांच्या प्रसंगी किना-यांवर मोठ्या प्रमाणावर आल्याची उदाहरणे मुंबईकर अनुभवतात. अशा प्रसंगांमध्ये देखील बृहन्मुंबई महानगरपालिका अतिरिक्त यंत्रणा व मनुष्यबळ नेमून तातडीने किनारे व चौपाट्या स्वच्छ करीत असते. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा तौक्ते चक्रीवादळानिमित्ताने आला आहे. तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावाने समुद्र खवळल्यानंतर मुंबईतील सातही चौपाट्यांवर मोठ्या प्रमाणावर कचरा आलेला आढळला. वादळाची तीव्रता असतानाही चारही दिवस म्हणजे दिनांक १५ ते १८ मे २०२१ या चारही दिवशी नियमितपणे चौपाट्यांवर स्वच्छता करण्यात आली. त्यात कोणताही खंड पडला नाही. १५ मे रोजी ३३ हजार ११० किलोग्रॅम, १६ मे रोजी ३९ हजार ६१० किलोग्रॅम, १७ मे रोजी १९ हजार १०० किलोग्रॅम तर १८ मे रोजी तब्बल ६२ हजार ०१० किलोग्रॅम इतका कचरा हटवून वाहून नेण्यात आला. म्हणजेच, तौक्तेच्या प्रभावाखाली असलेल्या चारही दिवसांत, सातही चौपाट्यांवर मिळून १५३ मेट्रिक टन कचरा हटविण्यात आला आहे. रात्रंदिवस अखंड प्रयत्न करुन या सर्व चौपाट्या स्वच्छ करण्यासाठी महानगरपालिकेच्या यंत्रणेने मेहनत घेतली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:52 PM 21-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here