‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून राज्यात प्रचंड वाद निर्माण झाला आहे. या पुस्तकाचा भाजपशी काहीही संबंध नसून लेखकाने माफी मागितली आहे आणि आता हा वाद संपलेला आहे, असं भाजपचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलं. मात्र पुस्तकाच्या लेखकाने जाहीर माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केली आहे. वाद अद्याप संपलेला नाही, या पुस्तकाचे प्रकाशन भाजप कार्यालयात झाले. त्यामुळे लेखकाने प्रकाश जावडेकरांच्या बाजूला बसूनच भाजप कार्यालयातून पत्रकार परिषद घ्यावी आणि जाहीर माफी मागावी. तरच हा वाद संपेल, असं नवाब मलिक यांनी म्हटले आहे. भाजपकडून प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तकावरुन राजकीय वर्तुळात पेटलेला वाद आणखी काही शमला नसल्याचं पाहायला मिळतंय. सोशल मीडियावरही याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. पुसतकावर बंदी घालण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे. कॉंग्रेसकडूनही लेखकाच्या जाहीर माफीची मागणी होत आहे. ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ हे पुस्तक दिल्लीतील भाजप नेते जय भगवान गोयल यांनी लिहिले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन भाजपच्या दिल्ली कार्यालयात करण्यात आले.
