राजापूर : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदीकरणाच्या कामात कोंढेतड येथे रस्त्यालगत बांधण्यात आलेली संरक्षक भिंत यावर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच सुमारे पाचशे फूट खोल दरीत कोसळली आहे. त्यामुळे या परिसरातून धावणाऱ्या वाहनांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. नागमोडी वळणांचा असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. त्यामध्ये राजापूर तालुक्यामध्ये सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामाचाही समावेश आहे. या कामाच्या दर्जाबाबत स्थानिकांकडून वारंवार तक्रारी केल्या जात आहेत. मात्र त्याकडे ठेकेदार कंपनीसह सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कानाडोळा केला जात आहे. याबाबत लोकांमधून वारंवार नाराजीही व्यक्त केली जात आहे. निकृष्ट दर्जाच्या कामाकडे लोकप्रतिनिधींनीही लक्ष दिलेले नाही. राजापूर शहानजीकच्या कोंढेतड येथे रस्त्यालगत संरक्षक भिंद बांधण्यात आली आहे. त्यामुळे त्या रस्त्यावरून धावणार्याा वाहनांना नजीकच्या सुमारे पाचशे फूट उंचीच्या दरीपासून संरक्षण मिळते. मात्र यावर्षीचा पाऊस सुरू होण्यापूर्वीच ही भिंत लगतच्या दरीत कोसळली आहे. त्यामुळे वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्यास रस्ता सोडून वाहन थेट सुमारे पाचशे फूट दरीत कोसळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भाजपचे तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांनी कोंढेतडचे माजी उपसरपंच अरविंद लांजेकर, अॅड. सुशांत पवार, मोहन घुमे आदींसमवेत कोसळलेल्या भिंतीची पाहणी केली. त्यानंतर ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींशी तातडीने संपर्क साधून निकृष्ट बांधकामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तातडीने नव्याने भिंत बांधण्याची सूचनाही त्यांनी दिली.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:08 PM 03-Jun-21