एनसीसीच्या कोल्हापूर ग्रुप अंतर्गत असणाऱ्या २ महाराष्ट्र नेव्हल बटालियनच्या १० दिवसीय कोकण योध्दा सागर मोहिमेचा शुभारभ बुधवारी भगवती बंदर येथे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.यावेळी कोल्हापूर एनसीसी ग्रुप कमांडर आर.बी. डोगरा, संचालक सुनील बालाकृष्णन तसेच बटालियन आणि मोहिमेचे प्रमुख असलेले कमांडर अलोक लागे यांची प्रमुख उपस्थिती होती.आयुष्यात कठीण मार्ग निवडल्यास अधिक यश प्राप्त होते कारण अशा स्थितीत शिस्त आणि मेहनत अधिक करावी लागते असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यावेळी म्हणाले. एनसीसीमध्ये मी होतो. इथं शिस्त आणि एकता शिकवली जाते. आजच्या देशातील स्थितीत याची अधिक आवश्यकता आहे असे ते म्हणाले. आज १५ जानेवारी अर्थात आर्मी डे आहे. याबद्दल त्यांनी याप्रसंगी शुभेच्छा दिल्या. या मोहिमेत प्रथम नाविक दलासोबत आर्मी आणि हवाई दलाच्या कॅडेटचा समावेश करण्यात आला आहे. १० दिवसांच्या या मोहिमेत तीन दलाच्या एनसीसी बटालियनचे ३५ मुले व २५ मुली असे ६० जण सहभागी होत आहेत. ग्रुप कमांडर म्हणून कोल्हापूर ग्रुप मध्ये माझ्या काळात मी सिंधुदूर्ग मध्ये दुसरे एनसीसी युनीट सुरु करु शकलो याचा मला आंनद आहे असे आर.बी. डोगरा यांनी यावेळी आपल्या मनोगतात सांगितले. ५१ वर्षांनतर असे युनीट या ग्रुप मध्ये सुरु झाले आहे. यामुळे आता कॅडेटसची संख्या ६ हजार पर्यंत वाढली आहे. सागरी मोहीम ही आव्हान असते. यात निसर्गाचा भरवसा नाही अशा स्थितीत संघभावना आणि नियोजन असल्याखेरीज टिकाव लागत नाही. निसर्गाची शक्ती आव्हान म्हणून उभी असते त्याचे रुपांतर आपल्या बाजूने शक्ती म्हणून वापरण्याचे कसब अशा मोहिमेत शिकायला मिळते असे संचालक सुनील बालाकृष्णन यांनी आपल्या भाषणात सांगितले. प्रास्ताविकात कमांडर अलोक लांगे यांनी मोहिमेची माहिती दिली. या प्रसंगी त्यांचे सहाय्यक शशिकांत जाधव यांनी एक सुंदर कविता सादर केली. यानंतर एनसीसी गीताने औपचारिक कार्यक्रम संपला.
