महात्मा गांधी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केलं जावं अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी पार पडली. याचिकाकर्त्याने महात्मा गांधी यांना भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी या याचिकेत केली होती. त्यावर सुनावणी करताना सरन्यायाधीश एस. ए. बोबडे म्हणाले की, महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत. ते आणि त्यांचं कार्य हे अशा कोणत्याही औपचारिक सन्मानाहून कितीतरी पटीने अधिक आहे. न्यायालयालाही हे वाटतं की, त्यांना सन्मान मिळायला हवा. पण, या देशातले नागरिक त्यांना कोणत्याही सन्मानापेक्षा खूप मोठं मानतात, असं सरन्यायाधीश यावेळी म्हणाले. त्यामुळे याचिकाकर्त्याने या मुद्द्याला केंद्र सरकारसमोर ठेवावं, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने स्वतः या प्रकरणात केंद्र सरकारला निर्देश देण्यास नकार दिला आहे.
