रत्नागिरी जिल्ह्यात डेंग्युबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे. जानेवारी ते डिसेंबर यावर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यात डेंग्युची लागण झालेले 229 रुग्ण सापडले आहेत. वर्षभरात 532 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. संशयित रुग्णांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत वाढल्याने मलेरिया विभागाने जिल्ह्यातील साथग्रस्त गावांवर लक्ष केंद्रीत केले होते. जिल्ह्यात एकुण सापडलेल्या 229 रुग्णांपैकी 172 स्थानिक तर 49 स्थलांतरित रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये संगमेश्वर तालुक्यात 17 रुग्णांना तर रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 154 रुग्णांना डेंग्युची लागण झालेली आढळली. सन 2014 मध्ये 185 जणांना डेंग्युची बाधा झाली होती. 2015 मध्ये 55 , 2016 मध्ये 43 , आणि 2017 मध्ये 58 रुग्णांना डेंग्युची बाधा झाली होती. 2018 मध्ये देखील अशीच परिस्थिती होती. जानेवारी 2019 ते डिसेंबर 2019 या कालावधीत डेंग्युची लागण झालेल्या रुग्णांची संख्या कमालीची वाढली. या कालावधीत डेंग्युबाधित 229 रुग्ण सापडले आहेत. या कालावधीत 532 रुग्णांची संशयित रुग्ण म्हणून तपासणी करण्यात आली होती. बाधित रुग्णांमध्ये रत्नागिरीत सर्वाधिक 154 रुग्ण सापडले. खेड मध्ये 38 पैकी 16, गुहागर 7 पैकी 3, संगमेश्वर मध्ये 35 पैकी 17, लांजामध्ये 21 पैकी 9, राजापूर मध्ये 45 पैकी 27, दापोली मध्ये 35 पैकी 3 रुग्णांना डेंग्युची लागण झालेली आढळली. चालूवर्षी मलेरिया आणि डेंग्यु रोगाला प्रतिबंध बसावा याकरिता आरोग्य केंद्रातील कर्मचारी गावागावांत जनजागृती करीत आहेत. मलेरियाची साथ उद्भवलेल्या गावांवर मलेरिया विभागाने विशेष लक्ष्य केंद्रित केल्याने या भागात साथीचा विळखा कमी प्रमाणात आहे. गावागावांत डास फवारणी यंत्रामार्फत फवारणी केल्याने साथीचा प्रादुर्भाव आटोक्यात आहे. जिल्ह्यात वर्षभरात हिवतापाचे 66 रुग्ण सापडले. यापैकी सर्वाधिक रुग्ण हे स्थलांतरित होते. 66 पैकी 43 रुग्ण स्थालांतरित तर 14 रुग्ण स्थानिक आणि 9 मजूर रुग्ण आहेत. 66 पैकी दापोली 8, खेड 1, चिपळूण 3, गुहागर 9, संगमेश्वर 15, रत्नागिरी 19, लांजा 1, राजापूर 10 रुग्ण सापडले आहेत.
