रत्नागिरी जिह्यातील तिवरे धरणफुटीमुळे बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पुणे येथील माळीणच्या धर्तीवर करण्यात येणार असून पुनर्वसनांतर्गत घरबांधणी, पाणीपुरवठा योजना आदी पायाभूत सुविधांच्या कामाला गती देण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. रत्नागिरी जिल्हा आढावा बैठक मंत्रालयात आयोजित केली होती. रत्नागिरी जिह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. सिंधुदुर्ग जिह्याचे पालकमंत्री उदय सामंत तसेच खासदार सुनील तटकरे, विनायक राऊत आदी उपस्थित होते. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गाचे चौपदीकरणाचे काम सुरू आहे. या महामार्गावर संगमेश्वर आणि सावर्डे (ता. चिपळूण) येथील इमारती बांधून पूर्ण असलेली मात्र कार्यान्वित नसलेली ट्रॉमा केअर सेंटर सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून निधी मिळवून कार्यान्वित करण्यासाठी प्रस्ताव देण्यात यावा. जिल्ह्यात सध्या बारा हजार लिटरहून अधिक दूध उत्पादन होते. जिल्ह्यात दुग्धव्यवसाय वृद्धीला मोठा वाव आहे. त्यासाठी हिरवा चारा निर्मितीचा कार्यक्रम हाती घ्यावा. तीर्थक्षेत्र विकास व पर्यटन क्षेत्र विकासअंतर्गत विविध ठिकाणांचा समावेश करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.
