सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशात दोनच मुलं जन्माला घालण्यासंबंधीचा कायदा असणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं आहे. भागवत यांच्या वक्तव्यावरून लोकसंख्या नियंत्रण हा विषय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अजेंड्यावर असल्याचं दिसून येतं आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये संघाच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मोहन भागवत यांनी असं म्हटलं आहे. मुरादाबादमध्ये मोहन भागवत यांनी बंद दाराआड झालेल्या एका चर्चेत देशात दोन मुलं जन्माला घालण्याचा कायदा आणला पाहिजे असं म्हटलं आहे. तसेच ‘लवकरच एका भव्य राम मंदिराची निर्मिती करण्यात येईल. राम मंदिर ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर संघ राम मंदिराच्या मुद्द्यापासून वेगळा होईल. सध्या देशातील वाढती लोकसंख्या हा चिंतेचा विषय आहे त्यासाठी दोन मुलं जन्माला घालण्याचा कायदा आणायला हवा. लोकसंख्या नियंत्रणात येईल’ असं भागवत यांनी चर्चेदरम्यान म्हटलं आहे.
