नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आज विरोधी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीला काँग्रेस वगळता भाजप विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीआधी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी तिसऱ्या किंवा चौथ्या आघाडीवर विश्वास नसल्याचं म्हटलं आहे. आता, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या बैठकाली गंभीरतेनं घेण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. कोणाला काय करायचं आहे, हा त्यांचा प्रश्न आहे. पण, लोकांच्या मनात नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे, 2024 मध्येही आत्ताच्या जागांपेक्षा अधिक जागांवर विजय मिळवून मोदीच पंतप्रधान होतील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच, 2019 साली याहीपेक्षा जास्त पक्षाचे नेते पश्चिम बंगालमध्ये एकाच मंचावर हात वर करुन उभा होते. मात्र, त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही, त्यामुळे या बैठकांचाही कुठलाही परिणाम होणार नाही, असेही फडणवीस यांनी म्हटले. दिल्लीत शरद पवार यांनी विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे, त्यासंदर्भात फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:11 PM 22-Jun-21