दापोली : वटपौर्णिमेच्या निमित्ताने दापोलीत वटवृक्षाच्या रोपांचे मोफत वितरण करण्यात आले. प्रत्येक घरामागे एक वृक्ष लावण्याचा उपक्रम दापोलीतील निवेदिता प्रतिष्ठानने आखला आहे. वारंवार होणा-या वृक्षतोडीमुळे आणि वादळात कोसळलेल्या वृक्षांमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. तो सुधारण्याच्या हेतून आज वटपौर्णिमेनिमित्त घरपट एक वडाचे रोप देण्याचा संकल्प निवेदिता प्रतिष्ठानने केला आहे. नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत परांजपे यांनी केले आहे. दापोलीतील प्रभाकर शिंदे यांनी आपल्या रोपवाटिकेतील दोन वर्षे वयाची वडाची रोपे निवेदिता प्रतिष्ठानला दिली आहेत. वटपौर्णिमेला नागरिकांनी एक तरी झाड लावावे आणि ते जगवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आपल्या स्वतःच्या जागेत अथवा सार्वजनिक ठिकाणी हे वृक्ष लावावेत, अशी अपेक्षा आहे. वडाच्या झाडाबरोबरच जैवविविधता जपणाऱ्या वृक्षांची रोपेही नागरिकांना देण्यात येणार आहेत. रस्त्याच्या कडेची आणि इतर अशी अनेक झाडे वादळात जमीनदोस्त झाली आहेत. अशा ठिकाणी हे वृक्ष लावले जाणार आहेत. या मोहिमेत ७०० वृक्षांची लागवड केली जाणार आहे. झाडे लावा, झाडे जगवा हा संकल्प निवेदिता प्रतिष्ठान शंभर टक्के राबविण्याचा निर्धार केलेले निवेदिता प्रतिष्ठानचे प्रशांत परांजपे यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, दापोलीतील स्वरस्वती विद्यामंदिर आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या आवारात अशोकवनाची संकल्पना राबवली जाणार असून अशोकाशिवाय इतर अनेक झाडे लावली जाणार आहेत. त्यांची जपणूक केली जाणार आहे. यासाठी प्रभाकर शिंदे यांचे योगदान लाभणार आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:39 PM 24-Jun-21