रत्नागिरी : येथील आस्था सोशल फाऊंडेशन या संस्थेने तृतीयपंथीयांना मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकीचे आपले व्रत जपले आहे. आस्था ही संस्था गेली बारा वर्षे दिव्यांगांसाठी कार्यरत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरदेखील आस्थाचे कार्य चालूच आहे. दिव्यांगांप्रमाणेच तृतीयपंथी हा समाजातील अत्यंत दुर्लक्षित आणि वंचित घटक आहे. दुर्दैवाने करोनाच्या आव्हानात्मक काळातदेखील अद्यापही त्यांना शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत झाली नाही. सन्मानाने जगण्याची इच्छा असूनही कोणीही काम देत नाही, बँका कर्ज देत नाहीत, राहण्यासाठी हक्काचे घर नाही, सामाजाकडून तुच्छ वागणूक मिळते, त्यामुळे नाइलाजाने त्यांना “मंगती” करून लाचारीचे जगणे जगावे लागत आहे. महिला धोरणात, शासन निर्णयात तृतीयपंथीयांच्या कल्याणाबाबत शासनाकडून सूचना असूनदेखील प्रत्यक्ष त्यांच्यापर्यंत काहीच पोहोचत नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील तृतीयपंथीयांचे नेतृत्व करणारी पल्लवी शर्मिला माने यांना आस्था संस्थेच्या प्रयत्नाने जिल्हास्तरीय दिव्यांग सुलभ निवड संनियंत्रण समितीवर घेण्यात आले. सर्वांचे ओळखपत्र तयार करून त्यात तृतीयपंथी अशी ओळख अद्ययावत करण्यात आली आणि त्यांच्या हक्क मिळविण्याचा प्रवास सुरू झाला. करोनाकाळात रेल्वे, आठवडा बाजार, बाजारपेठ बंद असल्यामुळे अतिशय बिकट परिस्थिती असलेल्या या तृतीयपंथीयांना संस्थेच्या माध्यमातून प्रधान टी कंपनीकडून किराणा सामानाचे किट आणि देणगीदार कृपाली बिडये यांच्याकडून प्रत्येकी एक हजार रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. पल्लवी माने, महेश्वरी लोहार, अक्षय शेट्ये, प्रमोद तांबे यांना प्रातिनिधिक स्वरूपात या वस्तू देण्यात आल्या. तृतीयपंथी या घटकालादेखील आपले विचार मांडण्यासाठी आपले हक्काचे विचारपीठ मिळावे, यासाठी आस्था परिवार प्रयत्न करणार आहे. यावेळी आस्थाच्या वतीने श्रीमती सुरेखा पाथरे, संकेत चाळके, कल्पेश साखरकर, संपदा कांबळे, व प्रधान टी कंपनीतर्फे श्रीमती खतीजा प्रधान, श्रुती बागवे उपस्थित होत्या.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:58 PM 25-Jun-21