महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहामध्ये देशभरातील १ हजार ८४६ स्टार्टअप्सचा सहभाग

0

मुंबई : राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीमार्फत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाला चांगला प्रतिसाद मिळाला असून देशभरातील १ हजार ८४६ स्टार्टअप्सनी या सप्ताहासाठी नोंदणी केली आहे. आरोग्यविषयक ३२०, शेतीविषयक २५२, शिक्षणविषयक २३८ अशा विविध क्षेत्रातील नवसंकल्पना सादर झाल्या असल्याची माहिती या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाच्या या चौथ्या आवृत्तीसाठी 12 मे 2021 पासून www.msins.in या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये कृषी, शिक्षण व कौशल्य, शासन, आरोग्य सेवा, स्मार्ट पायाभूत सुविधा, गतिशीलता, स्वच्छ ऊर्जा, कचरा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रात देशभरातील स्टार्टअप्सनी अर्ज केले आहेत. २७ राज्य व केंद्रशासित प्रदेशांकडून १ हजार ८४६ अर्ज प्राप्त झाले असून महाराष्ट्रातून सर्वाधिक ९४७ अर्ज प्राप्त झाले आहेत. आता या अर्जांची तज्ञांकडून तपासणी केली जाईल आणि जुलै 2021 च्या शेवटच्या आठवड्यात टॉप 100 स्टार्टअपची यादी जाहीर केली जाईल. टॉप 100 स्टार्टअप्सना 9 ते 13 ऑगस्ट, 2021 दरम्यान गुंतवणूकदार, तज्ज्ञ आणि वरिष्ठ शासकीय अधिकारी यांच्यासमोर सादरीकरण करण्याची संधी मिळेल. कोरोना साथीमुळे सर्व सादरीकरण सत्रे ही ऑनलाईन पद्धतीने होतील. यातील विजयी 24 स्टार्टअप्सना त्यांच्या नवसंकल्पना शासनाच्या संबंधीत विभागात वापरण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून प्रत्येकी १५ लाख रुपयांच्या कामांचे आदेश देण्यात येतील, असे मलिक यांनी सांगितले. यंदाच्या स्टार्टअप सप्ताहामध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक ९४७ स्टार्टअप्सनी सहभाग घेतला आहे. त्यानंतर कर्नाटक २०२, दिल्ली ८७, गुजरात ५४, केरळ ६४, मध्य प्रदेश ३४, तामिळनाडू ८९, तेलंगणा ५६, उत्तरप्रदेश ७५, राजस्थान ३७, हरयाणा ३२ याप्रमाणे विविध २७ राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशातील एकूण १ हजार ८४६ स्टार्टअप्सनी सहभाग घेतला आहे. महाराष्ट्रातून सर्वाधिक ३२२ अर्ज पुण्यातून आले आहेत. तर मुंबई २१२, मुंबई उपनगर ७०, औरंगाबाद १९, कोल्हापूर १३, नागपूर ४२, नाशिक ५२, पालघर १३, रायगड २३, ठाणे ९७ याप्रमाणे विविध जिल्ह्यांमधून अर्ज प्राप्त झाले आहेत. आरोग्यविषयक ३२०, कृषीविषयक २५२, शिक्षणविषयक २३८, गव्हर्नन्सविषयक ७२, कौशल्यविषयक ९४, स्मार्ट पायाभूत सुविधाविषयक १७६, परिवहनविषयक १२६, शाश्वत हरित उर्जाविषयक ५८, घनकचरा व्यवस्थापनविषयक ११०, पाणी व्यवस्थापनाबाबत ५१ तर इतर विविध विषयांबाबतच्या ३४९ स्टार्टअप्सनी या सप्ताहासाठी अर्ज केला आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून तरुणांच्या नवसंकल्पनांना मोठ्या प्रमाणात चालना आणि प्रोत्साहन देण्यात येईल, असे मलिक यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:15 PM 28-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here