जिल्ह्यात समुद्र पर्यटन, कृषी पर्यटन वाढण्यासाठी सलग दुसऱ्या वर्षी रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेतर्फे पर्यटन परिषद आयोजित केली आहे. येत्या २९ जानेवारीला सकाळी १० ते ४ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्पबचत सभागृहात दिवसभर होणाऱ्या परिषदेत चर्चासत्र, व्याख्याने, परिसंवाद होणार असल्याची माहिती रत्नागिरी पर्यटन सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर यांनी दिली. परिषदेला पर्यटनमंत्री, जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, पर्यटन महामंडळाचे अधिकारी, रेल्वेचे अधिकारी, बांधकाम अधिकारी उपस्थित राहणार आहेत. परिषदेत मकरंद केसरकर, सुधीर रिसबूड, किशोर धारिया, कृषी पर्यटन तज्ज्ञ योगेश आपटे आदी मार्गदर्शन करणार आहेत. परिषद सर्वांसाठी मोफत खुली आहे. भाटलेकर यांनी सांगितले की, जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देण्याची गरज आहे. यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत आहे. पर्यटन क्षमता, आव्हाने, संधी, विकास व नियोजन या दिशेने योग्य आराखडा तयार करण्याच्या हेतूने दुसरी पर्यटन परिषद आयोजित केली आहे. या परिषदेमध्ये कृषी (अॅआग्रो) पर्यटन आणि हेरिटेज टुरिझम हे महत्त्वाचे दोन विषय हाताळण्यात येणार आहेत. दुसर्याग सत्रामध्ये शाश्वॅत पर्यटन क्षमता आणि आव्हाने यावर चर्चासत्र होईल. त्यामध्ये हॉटेल्स असोसिएशन, टूर ऑपरेटर, ट्रॅव्हल एजंट, सामाजिक आणि पर्यटन संस्था, लोकप्रतिनिधी, पर्यटन प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण, सागरी महामार्ग, नवे पूल, रेल्वेचे दुपदरीकरण, जहाज वाहतूक, लवकरच सुरू होणारी प्रवासी विमान वाहतूक यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. पर्यटक गोव्याऐवजी रत्नागिरीत राहिला पाहिजे, यातून जिल्ह्याचा विकास होऊ शकतो आणि तरुणांना रोजगारही मिळू शकतो, याकरिता परिषद आयोजित केली आहे. परिषदेत जास्तीत जास्त शेतकरी, आंबा बागायतदार, तरुण बेरोजगार, हॉटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी, समुद्रकिनारी जमीन असणारे शेतकरी, पडीक जमिनींचे मालक, पर्यटन व्यावसायिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भाटलेकर यांनी केले आहे.
