मोदी सरकारला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं मोठा झटका दिला आहे. 2019-20मध्ये भारताच्या सकल घरगुती उत्पादना(जीडीपी)च्या अंदाजात वाढ फक्त 4.8 टक्के राहील. आयएमएफच्या अहवालावरून काँग्रेसनं मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम आणि माजी कायदा मंत्री कपिल सिब्बल यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. आयएमएफच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ यांनी खरी वस्तुस्थिती मांडल्यानंतर त्यांना आता लक्ष्य केलं जाईल, असं पी. चिदंबरम म्हणाले आहेत. सर्वात पहिल्यांदा नोटाबंदीच्या निर्णयावर आयएमएफच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ यांनी टीका केली होती. आता मोदींचे मंत्रीसुद्धा त्यांच्यावर हल्लाबोल करतील. अनेक प्रयत्नांनंतरही जीडीपी 4.8 टक्केच राहणार आहे. हा विकासदर आणखी खाली घसरला तरी आम्हाला आश्चर्य वाटणार नाही, असंही ट्विट करत पी. चिदंबरम यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
