संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून, कामकाजाचे 19 दिवस असणार

0

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन येत्या 19 जुलैपासून सुरू होणार आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी यासदंर्भात सोमवारी माहिती दिली. संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलै ते 13 ऑगस्ट या कालावधीत होईल. यादरम्यान कामकाजाचे 19 दिवस असणार आहेत, असे ओम बिर्ला यांनी सांगितले.

कोविड नियमांनुसार सर्व सदस्य आणि माध्यमांना परवानगी दिली जाईल. आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य नाही. ज्या सदस्यांनी लस घेतली नाही, त्यांना कोरोनाची चाचणी घेण्यास आम्ही विनंती करू, असे लोकसभा सभापती ओम बिर्ला म्हणाले.

दरम्यान, या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्ष अनेक विषयांवर सरकारला घेराव घालण्याचा प्रयत्न करेल. उत्तर प्रदेशातील नुकत्याच झालेल्या ब्लॉक प्रमुख निवडणुकीत झालेला हिंसाचार, कोरोना लसीकरण किंवा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी या सर्व मुद्दयांवरून विरोधी पक्ष मोदी सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे.

याचबरोबर, कृषी कायदे रद्द करण्याची मागणीही संसदेत पुन्हा एकदा होऊ शकते. दुसरीकडे, संसदेचे जास्तीत जास्त कामकाज कोणत्याही अडथळाविना करता येईल, याची खात्री करुन घेण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न असेल. तसेच, या पावसाळी अधिवेशनात मोदी सरकार जास्तीत जास्त बिले मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दिसून येते.

दरवर्षी पावसाळी अधिवेशन हे जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होते आणि स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर संपते. गेल्या वर्षी कोरोनाच्या संकट काळात 14 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर असा संसदेच्या अधिवेशनाचा कार्यक्रम ठरवण्यात आला होता. कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंगनुसार खासदारांची बैठक व्यवस्था, दोन रांगांमध्ये काचांचे आवरण अशा अनेक पद्धतीने करण्यात आली होती. खासदारांच्या डेस्कसमोर काचेचे आवरणही लावण्यात आले होते. इतकेच नाही तर उभे राहून बोलण्यास मनाई करण्यात आली होती.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
2:40 PM 12-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here