चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप याने पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जहरी टीका केली आहे. अमित शहा यांना प्राण्याची उपमा देत इतिहास अशा प्राण्यावर थुंकेल, अशी कडवट टीका त्याने केली आहे. अमित शहा यांच्या दिल्लीतील सभेत एका व्यक्तीने नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यावेळी सभेतील भाजप कार्यकर्त्यांनी त्याला बेदम चोप दिला होता. अमित शहांनी त्यानंतर त्या व्यक्तीला सभेबाहेर घेऊन जाण्यास सुरक्षारक्षकांना सांगितलं होतं. या घटनेचा संदर्भ देत अनुरागने शहांवर निशाणा साधला आहे. आपला गृहमंत्री अती घाबरट आहे. पोलीस त्याचे, गुंड त्याचे, सेना त्याचीच आहे. तरीही निशस्त्र प्रदर्शन करणाऱ्यांवर हल्ला करवतो. नीच पातळीची सीमा अमित शहा आहेत. इतिहास अशा प्राण्यावर थुंकेल, अशी आक्षेपार्ह टीका अनुरागने केली आहे. अनुरागच्या या आक्षेपार्ह टीकेचे सोशल मीडियावर पडसाद उमटत आहेत. अनुराग कश्यपने टीका करावी पण आपली भाषा त्याने जपून वापरावी, असा सल्ला जेष्ठ पत्रकार अजित अंजूम यांनी त्याला दिला आहे.
