सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपूर्ण पाटबंधारे प्रकल्पांसाठी 505.05 कोटींची तरतूद

0

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील अपूर्ण पाटबंधारे प्रकल्पांसाठी 505.05 कोटी रुपयांची तरतूद महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून करण्यात आली असून यासाठी शिवसेनेचे संसदीय गटनेते तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांच्या जिल्हा संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुसंख्येने असलेला शेतकरी बांधव, त्यांची शेती व्यवसायात असलेली विशेष रुची व शेतीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होत असलेले नवनवीन प्रयोग विचारात घेता, जिल्ह्यातील सिंचनाचे अपूर्ण असलेले प्रकल्प तातडीने पूर्ण होऊन लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जमिनी ओलिताखाली खाली येणे आवश्यक होते. जिल्ह्यातील अनेक पाटबंधारे प्रकल्प निधी अभावी अपूर्ण होते. त्यातील काही कालवे नादुरुस्त असल्याने तर काही कालवे नसल्याने त्यातील पाणी शेतकऱ्यांना मिळत नव्हते. याची दखल घेत खासदार विनायक राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्रान्वये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपूर्ण पाटबंधारे प्रकल्पाना पूर्ण करण्यासाठी निधीची मागणी केली होती. त्यास अनुसरून महाराष्ट्र शासनाने यावर्षीच्या (सन 2021- 22) च्या अर्थसंकल्पामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपूर्ण पाटबंधारे प्रकल्पाना 505.05 कोटी एवढ्या भरीव निधीची तरतूद केली आहे. जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी खासदार राऊत यांना पत्राद्वारे त्याची माहिती दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने तिलारी (77 कोटी), कोर्ले सातनडी (10 कोटी), देवधर (50 कोटी), नरडवे (175 कोटी), अरुणा (150 कोटी), तरंदळे (10 कोटी), नाधवडे (5 कोटी), देदोनवाडी (10 कोटी), ओताव(10 कोटी), निरुखे (8 कोटी) यांसह अन्य प्रकल्पांचा समावेश आहे. या भरीव निधीमुळे प्रकल्पांची कामे मार्गी लागणार असल्याची माहिती खासदार राऊत यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:54 PM 21-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here