मी भाजपा सोडणार या अफवांवर विश्वास ठेवू नका असं सांगत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपलं एकदिवसीय लाक्षणिक उपोषण मागे घेतलं. मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी पंकजा मुंडे यांनी औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर हे उपोषण केलं. यावेळी बोलताना मुंडे म्हणाल्या, कार्यकर्ते सध्या चांगलं वागत आहेत, विरोधात असताना तुम्ही चांगलं वागता का? त्यामुळे विरोधातच बसावं का? असा मिश्किल प्रश्नही पंकजा मुंडे यांनी विचारला. नवे सरकार स्थापन होऊन १०० दिवस झाले आहेत. त्यामुळे मी सरकारवर लगेच कोणतीही टीका करणार नाही. मात्र सरकारकडून चांगल्या अपेक्षा आहेत. तसेच मी मराठवाड्यात समाजसेविका म्हणून काम करणार असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचे आणि तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. ठाकरे सरकारने इथला प्राणी प्रश्न सोडवला पाहिजे. तसंच आमच्यापेक्षा चांगलं काम करुन दाखवा असंही आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं आहे. मराठवाड्यातले शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी उद्धव ठाकरे चांगलं काम करतील असाही विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.
