राजकीय पक्ष नेहमी आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी व्यापाऱ्यांना बंद मध्ये सहभागी करवून घेतात. मात्र आता व्यापारी या सर्व कारणांमुळे वैतागलेल्या व्यापाऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी पाळणार नाहीत, असा निर्णय महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सने घेतला आहे. राज्यात यापुढे कोणत्याही बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचा ठराव, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सने केला आहे. सतत होणाऱ्या बंद आणि आंदोलनामुळे आर्थिक नुकसान होत असल्याचे सांगत व्यापारी संघटनेने हा ठराव मांडला आहे. त्यानुसार आगामी काळात कोणत्याही राजकीय पक्षाच्या बंदला व्यापारी पाठिंबा देणार नसल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी दिली आहे. महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे पुण्याचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनीही या ठरावाला पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, राज्यभरात व्यापाऱ्यांनी ठराव मोहिमेचा कार्यक्रम हाती घेतला आहे.मागील काही वर्षांपासून बंद आणि आंदोलनाचे प्रकार देशभरात वाढले आहेत. बंद आणि आंदोलनाचा सर्वात जास्त फटका बसतो तो सामान्य व्यापाऱ्यांना. बंद काळात दुकाने बंद ठेवल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. शिवाय आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडला तरी दुकाने संकटात सापडतात. या सततच्या गोष्टींना व्यापारी वर्ग वैतागल्याने त्यांनी हा ठराव मांडल्याची माहिती दिली आहे.
