‘अभाविप’तर्फे चिपळूणला दहा दिवस महाआरोग्य अभियान

0

रत्नागिरी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे येत्या १ ते १० ऑगस्ट या कालावधीत चिपळूण येथे महाआरोग्य अभियान राबविण्यात येणार आहे. कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे काही भागात पूर परीस्थिती निर्माण झाली आहे. कोविड १९ च्या दुसऱ्या लाटेतून सावरत असतानाच कोकणावर महापुराचे संकट आले आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कंबर कसून उतरली आहे. चिपळूणमधील पूरग्रस्त भागात भोजन वाटप, पाणी वाटप, रेशन किट वाटप इत्यादी सेवा अहोरात्र पुरवत आहे. तसेच वैद्यकीय सेवा व प्राथमिक उपचार पुरविण्यात येत आहेत. विशेषतः अनाथाश्रम, गर्भवती महिला अशा लोकांना घरपोच वैद्यकीय सेवा पुरविण्याचे सेवाकार्य अभाविप करत आहे. पूर परिस्थितीमुळे घर, दुकाने यांच्या साफसफाईसाठी कार्यकर्ते सेवा पुरवत आहे. येणाऱ्या काळात विद्यार्थी परिषद जिज्ञासा व मेडिव्हिजन यांच्या सहकार्याने महाआरोग्य अभियान हाती घेत आहे. या अभियानात १ ऑगस्ट ते १० ऑगस्ट या कालावधीत चिपळूणमधील पूरग्रस्त भागातील २०,००० पेक्षा अधिक नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी केली जाणार आहे. हे अभियान पूरग्रस्त भागातील विविध ५० ठिकाणी राबविण्यात येणार आहे. तसेच पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे चालू शैक्षणिक वर्षाचे पालकत्व विद्यार्थी परिषद घेणार आहे. त्याचबरोबर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटपही अभाविप करणार आहे. या सेवाकार्यात सढळ हातांनी मदत करावी, असे आवाहन अभाविपने केले आहे. पूरपरिस्थितीत नागरिकांना सेवा देण्यात विद्यार्थी परिषद नेहमीच कटीबद्ध राहील, अशी ग्वाही उत्तर रत्नागिरी जिल्हा संयोजक मृणाली गुरव यांनी दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:24 PM 29-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here