विद्यार्थ्यांनी देशभक्तीची भावना जपली पाहिजे. त्यांना स्वातंत्र्यामागच्या बलिदानाचे महत्त्व कळावे, यासाठी विद्यापीठ आणि महाविद्यालयातील सार्वजनिक कार्यक्रमाची सुरुवात ही राष्ट्रगीतानेच करावी, असा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली. मुंबई आणि महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, फलटण, यांच्या संयुक्त विद्यमाने एलफिन्स्टन महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या तैलचित्राचे अनावरण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उदय सामंत म्हणाले, चित्रपटगृहामध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत होत असते. देशासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती निर्माण व्हावी यासाठी सर्व विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमाची सुरुवात ही राष्ट्रगीतानेच झाली पाहिजे.
महाविद्यालयात मराठी फलक
आपल्या मातृभाषेचा अभिमान आपल्याला असला पाहिजे. सर्व महाविद्यालयांच्या नावाचे फलक हे मराठीतच लावावेत अशा सूचनाही महाविद्यालयांना देण्यात येणार आहेत, असे उदय सामंत यांनी सांगितले.