अकरावीच्या प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा हायकोर्टाकडून रद्द

0

मुंबई : राज्यात 11 प्रवेशसाठी होणारी सीईटी अर्थात प्रवेश परीक्षा रद्द करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाने हा महत्वाचा निकाल दिला. दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना 11 वी मध्ये प्रवेशासाठी 21 ऑगस्ट रोजी CET परीक्षा नियोजित होती. मात्र, हायकोर्टाने सर्व बाजू ऐकल्यानंतर प्रवेश परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावीचा निकाल 16 जुलै रोजी जाहीर केला. मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतित्रापत्रानुसार राज्यात अकरावीसाठी सामाईक प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येणार होती. या परीक्षेसाठी मंडळाच्यावतीनं पोर्टल तयार करण्यात आलं होतं. सीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत 2 ऑगस्टपर्यंत देण्यात आली होती. आयसीएसई बोर्डाच्या एका विद्यार्थिनीनं सीईटी परीक्षेसंदर्भात उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली होती. अकरावी प्रवेश परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत 2 ऑगस्टला संपली आणि सीबीएसईचा दहावीचा निकाल 3 ऑगस्टला जाहीर झाल्यानं सीबीएसई शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर अडचण निर्माण झाली होती. मुंबई हायकोर्टात राज्यात अकरावी प्रवेशाबाबत सीईटी प्रवेश परीक्षा घेण्या संदर्भातील याचिकेवरील पुढील सुनावणी आज झाली. मुंबई हायकोर्टात राज्य सरकार तर्फे आशुतोष कुंभकोणी यांनी बाजू मांडली. राज्य सरकारनं अकरावी प्रवेशाबाबत 28 मे रोजी जारी केलेल्या परिपत्रकाला स्थगिती देण्याची मागणी करत अनन्या पत्की या आयसीएससीच्या विद्यार्थिनीनं ही याचिका आपले वडील अॅड. योगेश पत्की यांच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्ती आर.डी. धानुका आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
3:32 PM 10-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here