रत्नागिरी : जगप्रसिद्ध हापूस आंब्याची दयनीय अवस्था झाल्याने शासनाने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना उभारी द्यावी, अशी मागणी पावस परिसर आंबा बागायतदार संघटनेचे अध्यक्ष आणि रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक प्रकाश साळवी यांनी केली. पावसमध्ये हापूस आंबा बागायतदार सहकार संस्थेची वार्षिक सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. २००९ मध्ये फियान वादळ झाले. त्यामध्ये झाडांचे पूर्ण नुकसान झाले होते. त्यावेळीही शासनाकडून पुरेशी मदत मिळाली नव्हती. त्यानंतर २०१५ मध्ये ३ मार्चला अवकाळी पाऊस झाला. त्यावर्षी पूर्ण आंबा खराब झाला. त्यावर्षी सरकारने तीन महिन्यांचे व्याज देतो, असे जाहीर केले. त्याचा एक रुपयाही आंबा बागायतदारांना मिळालेला नाही. त्यामुळे आर्थिक संकटात आलेल्या शेतकऱ्याचे कर्ज पुनर्गठन करून दिले होते. त्या पुनर्गठनाचे एक वर्षाचे व्याज व चार वर्षांचे सहा टक्के व्याज देतो, असे सांगितले होते. त्याचेही पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. आंबा बागायतदारांनी शेती कर्ज घेतले आहे. त्यावर विमाही काढला आहे. परंतु विम्याच्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना विम्याचा लाभ होत नाही. त्यासाठी शासनाने विमा कंपन्यांकडून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी आणि विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी, अशी मागणी या सभेमध्ये करण्यात आली.
सभेला पावस पंचक्रोशीतील आंबा बागायतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रदीप सावंत, अक्रम नाखवा, सुहास शिंदे आदींचा समावेश होता.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:22 PM 12-Aug-21