भाजपाच्या चार केंद्रीय मंत्र्यांची १६ ऑगस्टपासून जनआशीर्वाद यात्रा; सर्व महाराष्ट्र करणार दौरा

0

मुंबई : काही दिवसांपूर्वीच देशात मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. यात महाराष्ट्रातून ४ जणांची वर्णी लावण्यात आली. नारायण राणे, भारती पवार, भागवत कराड आणि कपिल पाटील यांच्या माध्यमातून भाजपानं विभागीय समतोल आणि सर्वसमावेशक राजकारण केले. त्यानंतर आता नवनियुक्त केंद्रीय मंत्र्यांच्या माध्यमातून भाजपा राज्यभरात दौरा आखत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री नारायण राणे, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील हे चार नवनियुक्त मंत्री जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यासाठी येत्या १६ ऑगस्टपासून हे मंत्री राज्याच्या वेगवेगळया भागात जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या यात्रेचे प्रमुख आमदार संजय केळकर यावेळी उपस्थित होते. उपाध्ये यांनी सांगितले की, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांची यात्रा १६ ते २० ऑगस्ट या काळात, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची यात्रा १६ ते २० ऑगस्ट या काळात , केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची यात्रा १६ ते २१ ऑगस्ट या काळात तर केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची यात्रा १९ ते २५ ऑगस्ट या काळात दौरा काढणार आहेत.
यात्रेचे प्रमुख आमदार संजय केळकर यांनी सांगितले की, कपिल पाटील यांची यात्रा ठाणे, रायगड जिल्ह्यात ५७० किलोमीटर प्रवास करणार आहेत. डॉ. भारती पवार यांची यात्रा पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील ५ लोकसभा मतदारसंघात ४३१ किलोमीटर एवढा प्रवास करेल. डॉ. भागवत कराड यांची यात्रा मराठवाड्यातील ७ लोकसभा मतदार संघात ६२३ किलोमीटर प्रवास करेल. नारायण राणे यांची यात्रा १९ ऑगस्ट रोजी मुंबईतून सुरु होईल. वसई- विरार महापालिका क्षेत्र आणि रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही यात्रा ६५० किलोमीटर एवढा प्रवास करेल. या यात्रेत हे चारही मंत्री समाजाच्या विविध घटकांचे प्रश्न जाणून घेतील तसेच केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांशीही संवाद साधतील. आमदार निरंजन डावखरे, आमदार सुनील राणे, आमदार अशोक उईके, प्रमोद जठार, राजन नाईक हे या यात्रांचे समन्वयक म्हणून काम पाहतील, असेही आमदार केळकर यांनी नमूद केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:01 PM 13-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here