राजापूर तालुक्यातील आंबोळगड येथील प्रस्तावित आयलॉग प्रकल्पाला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्थगिती दिली आहे. याबाबतचे आदेश त्यांनी मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी आणि पर्यावरण सचिवांना दिले आहेत. नाटे ते आंबोळगड या समुद्र किनाऱयावर आयलॉग कंपनीतर्फे बंदर उभारण्यात येणार आहे. या बंदरासाठी कंपनीकडून जागेची खरेदीही करण्यात आलेली आहे. प्रकल्पाच्या विरोधात व आंबोळगडमधील जैवविविधतेच्या रक्षणासाठी येथील जनहक्क सेवा समिती कार्यरत असून ६ फेब्रुवारी रोजी या प्रकल्पाच्या विरोधात राजापूर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा या समितीने केली होती.