मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच त्यांच्या अटकेचे आदेश देण्यात आले असून, नाशिकचे पोलीस पथक राणेंना अटक करण्यासाठी रवाना झाले आहेत. दरम्यान, नारायण राणेंच्या अटकेच्या आदेशावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी नारायण राणेंवर घणाघाती टीका केली आहे. नारायण राणेंना अटक करण्यापेक्षा त्यांना ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे, असा सल्ला गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गुलाबराव पाटील म्हणाले की, नारायण राणेंची जीभ घसरली असं म्हणण्यापेक्षा त्यांना ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे. एक केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री ज्यांनी ही पदं भुषवलेली आहेत. मुख्यमंत्रिपदाची गरिमा काय असते हे त्यांना माहिती आहे. मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा आहे यापेक्षा मुख्यमंत्री हा संपूर्ण राज्याचा असतो. राज्याच्या मुख्यमंत्र्यांबाबत आपण काय बोलावं, याचं जर त्यांना भान नसेल, तर मला तरी वाटतं की त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे. वेळ पडली तर त्यांना शॉक दिले पाहिजेत. प्रगतीशील महाराष्ट्र राज्याचे नारायण राणे हे मुख्यमंत्री होते. आदरणीय पवारसाहेब होते. विलासराव देशमुख हेही मुख्यमंत्री होते. तेव्हाही विरोधी पक्ष होता. पण त्यांची एक गरिमा होती. पण आता गरिमा नसलेलं भूत इथं आलेलं आहे. मला तरी वाटतंय की यांच्या अंगामध्ये चुडैल घुसली असावी. त्यामुळे त्यांना भानुमतीच्या भगताकडे नेलं पाहिजे आणि त्यांच्या अंगात काय घुसलंय ते पाहिलं पाहिजे, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
11:21 AM 24/Aug/2021