राजापूर तालुक्यात २५ शेतकऱ्यांची ईपीक पाहणी अॅपवर नोंद

0

राजापूर : शेतात लागवड केलेल्या पिकासह शेतातील अन्य नोंदीच्या नोंदी यापूर्वी तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांमार्फत केल्या जात होत्या. त्यामध्ये बदल करण्यात आला असून पीकपेरणीच्या या नोंदी आता शेतकरी स्वतःच्या अॅन्ड्रॉइड मोबाइलवरून विकसित केलेल्या अॅपद्वारे करीत आहेत. शासनाच्या ईपीक पाहणी अॅपच्या माध्यमातून राजापूर तालुक्यातील पंचवीसहून अधिक शेतकऱ्यांनी आजपर्यंत नोंदणी केल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली. ईपीक पाहणी अॅपद्वारे पीकपेरणीची नोंद नेमकी कशी करावी, यासंबंधी प्रांताधिकारी वैशाली माने, तहसीलदार शीतल जाधव यांच्या उपस्थितीत मंडल अधिकारी, तलाठी, कृषी अधिकारी, कर्मचार्यांची कार्यशाळा झाली. शेतकऱ्यांचे प्रबोधन करून जास्तीत जास्त पीकपेरणीच्या नोंदी या अॅपद्वारे करण्याचे आवाहन प्रांताधिकारी सौ. माने आणि तहसीलदार सौ. जाधव यांनी केले होते. त्यानुसार शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात आले. सातबारा उताऱ्यावर दरवर्षी सप्टेंबरअखेर शेतकर्यांतनी पेरणी केलेल्या पिकांची नोंदणी तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांमार्फत केली जात होती. मात्र यावर्षीपासून शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतातील पीकपेरणीची माहिती ईपीक पाहणी अॅपद्वारे मोबाइल फोनवरून स्वतः भरावयाची आहे. त्यासाठी विकसित करण्यात आलेले अॅप आपल्या मोबाइलवर डाउनलोड करून घ्यायचे आहे. या उपक्रमामध्ये पीकपेरणी अहवालात शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष सक्रिय सहभाग वाढणार आहे. पिकाची माहिती शेतकऱ्यांनी स्वतः भरावयाची आहे. वैयक्तिक माहिती भरून खातेदार म्हणून नोंदणी केल्यानंतर गट आणि खाते नंबर, पिकाची माहिती, हंगामनिहाय माहिती, पिकांचे छायाचित्र काढून ते अपलोड करावे लागणार आहे. या अहवालानुसार सातबारा उताऱ्यावर पिकांच्या नोंदी केल्या जाणार आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:32 PM 26-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here