टुरिस्ट व्हिसा घेऊन आलेले काही बांगलादेशी लोक आक्षेपार्ह गोष्टी करत आहेत. त्यांना प्रतिबंध करण्याची मागणी भाजप जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना निवेदनाद्वारे केली. निवेदनात म्हटले आहे, रत्नागिरी शहराच्या राजिवडा परिसरात बांगलादेशी नागरिक टुरिस्ट व्हिसा घेऊन वास्तव्यास आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हे टुरिस्ट जमाते तबलिकच्या प्रसारासाठी काम करणारे आहेत. टुरिस्ट व्हिसा असल्याने त्यांनी केवळ टुरिस्ट म्हणून राहणे अपेक्षित आहे. तसेच या व्यक्तींनी एकाच शहरात बराच काळ राहणे आक्षेपार्ह आहे. ते ज्यांच्या संपर्कात आहेत, त्याबाबतही जागरूकता ठेवणे गरजेचे आहे. टुरिस्ट व्हिसाचा उपयोग करून रत्नागिरीच्या वास्तव्यात ते धार्मिक प्रसार तसेच राष्ट्रीय सरकारविरोधात गैरसमज पसरवत फिरत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने व स्थानिक सलोखा व शांततेला बाधा आणणारी आहे. शहरात त्यांचे असलेले वास्तव्य आणि चाललेल्या आक्षेपार्ह हालचाली हा विषय संवेदनशील असून गंभीर आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आपणापर्यंत माहिती देत आहोत. पोलीस खात्याचे लक्ष वेधण्यासाठी हे निवेदन देत आहोत. अशा बांगलादेशी नागरिकांविरुद्ध त्वरित प्रतिबंधात्मक कारवाई करावी.
