मुंबई : राज्यात कोरोना प्रादुर्भाव कमी असला तरी काही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. तसेच कोरोना लसीकरणावर भर देण्यात येत आहे. दरम्यान, राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात शाळा, महाविदयालये सुरु होणार का, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. राज्यात लवकरच शाळा, महाविद्यालय सुरु करण्याबाबत भूमिका घेण्यात येईल. ऑक्टोबर महिन्यात काय परिस्थिती आहे, ते पाहून पुढचे पाऊल, उचलण्यात येईल, असे अजित पवार यांनी आज स्पष्ट केले. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून ऑनलाइन वर्गात बसून कंटाळलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी हाती आली आहे. राज्यात दिवाळीनंतर शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. याबाबत लवकरच आढावा घेऊन अंतिम निर्णय होईल अशी माहिती अजित पवार यांनी आज दिली. कोरोनाची परिस्थिती काय आहे. 2 ऑक्टोबरपर्यंत काय परिस्थिती असेल ते बघायचे. त्यानंतर कॉलेज टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबत निर्णय घेता येऊ शकतो का, यावर चर्चा होईल, असे ते म्हणाले. तसेच शाळांबाबत लहान मुलांच्या लसी आल्या की त्यांचे लसीकरण करायचे आणि दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याची आमची मानसिकता आहे, असे अजित पवार यांनी म्हटले. अंतिम निर्णय हा शाळा, महाविद्यालये सुरु करण्याबाबत आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. त्यानंतर निर्णय होईल, असे ते म्हणाले.
राज्यात कोरोना नियंत्रणात आल्यानंतर टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या ग्रामीण भागात कोरोना रुग्ण नसलेल्या गावांमध्ये इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत. आता उर्वरित वर्ग लवकरच सुरू होतील अशी आशा आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:35 PM 23-Sep-21