औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यासह राज्यातील काही भागात तुफान पाऊस झाला. या पावसानं होत्याचं नव्हतं करुन टाकलं आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेतकऱ्यांचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हजारो हेक्टरवरील पिकं पाण्यात गेली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे 476 कोटी सात लाख 75 हजारांचे नुकसान झाले आहे. मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आजपर्यंत 25 लाख 98 हजार 213 हेक्टरचे नुकसान झाले आहे तर बाधित शेतकऱ्यांची संख्या 35 लाख 64 हजार 391 इतकी आहे. 90 टक्के पंचनामे झाल्याचा दावा विभागीय आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आला आहे.
मराठवाड्यातील चार हजार तीनशे नव्वद किमीचे रस्तेही खराब झाले आहेत. यासाठी 341 कोटी 37 लाख 98 हजार रुपयांची गरज आहे. मराठवाड्यात वाहून गेलेल्या पुलांची संख्या 1077 ,यासाठी 45 कोटी 33 लाख 75 हजार रुपयांची गरज आहे, असं विभागीय आयुक्त कार्यालयानं सांगितलं आहे.
116 शासकीय इमारतींचं अतिवृष्टीमुळं नुकसान झालं आहे तर 71 जिल्हा परिषदेच्या शाळाही क्षतीग्रस्त झाल्या आहेत. मराठवाड्यात पावसामुळं 22 लोकांचा मृत्यू झाला आहे. जवळपास चारशे जनावरं दगावल्या आहेत. 14 पक्की घरं आणि इतर 2072 घरांची पडझड या अतिवृष्टीमुळं झाली आहे. पूररेषेतील गावांची संख्याही 440 तर ब्ल्यू लाईनमध्ये 97 गाव असल्याची माहिती विभागीय माहिती कार्यालयानं दिली आहे. तर नऊ गावांना अद्यापही पुरांचा वेढा आहे. 104 गावांचा अद्यापही संपर्क तुटलेला आहे. पुरात 777 लोक अडकले होते. एकूण 1101 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयानं सांगितलं आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:59 PM 30-Sep-21