एजीआर (अॅडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू) थकबाकीवरून सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी टेलिकॉम कंपन्यांना तीव्र शब्दांत फटकारले आहे. कंपन्यांनी सरकारला एक पैसा दिला नसून १७ मार्चपर्यंत थकबाकी भरण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर सहा तासांनी केंद्र सरकारनेही कंपन्यांना रात्री १२ वाजायच्या आत थकबाकी भरण्याचे निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आणि आयडियावर गंडांतर आले आहे. प्रत्येक महिन्याला होणार्या नुकसानानंतर आपला व्यवसाय चालवणे दोन्ही कंपन्यांना कठीण जाणार आहे. आज दोन्ही कंपन्यांनी आपली महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर दोन्ही कंपन्यांचे भविष्य ठरणार आहे. सातत्याने आर्थिक नुकसानीमुळे व्होडाफोन हिंदुस्थानमधून आपला व्यवसाय बंद करण्याची शक्यता आहे. तसेच आयडियावरही गंडांतर आलेले आहे.
