रत्नागिरी : सत्ता ही सापशिडीचा खेळ आहे. ती वरखाली होत असते. याचा अर्थ जे खाली गेले आहेत, ते डावातूनच बाद झाले असे होत नाही. पुन्हा सत्तेवर येण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने आपल्या कार्याचा वेग ५० टक्के इतका ठेवावा. उर्वरित ५० टक्के वेगाची साथ वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि मंत्र्यांकडून मिळेल. अशा पक्ष कार्यातून काँग्रेसला उभारी देऊ या, असे मत काँग्रेसचे नेते तथा राज्याचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी नूतन काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या पक्षप्रवेश समारंभावेळी व्यक्त केले. काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांचा पदग्रहण सोहळा काँग्रेसभवन येथे पार पडला. यावेळी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, काँग्रेसला स्वातंत्र्याचा इतिहास आहे. म्हणूनच हा पक्ष कठीण काळात अजूनही गरिबांना न्याय देतोय. नव्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील काँग्रेसला उभारी मिळेल. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकत्यांनी समाजकार्य केले पाहिजे. त्यांना आम्ही आवश्यक ती ताकद देऊ. अशा कार्यातूनच पूर्वीप्रमाणे जिल्ह्यात काँग्रेसला नवसंजीवनी मिळणार आहे. नूतन जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांना सल्ला देताना त्यांनी सांगितले की, तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून काम करा. सर्वांना बरोबर घेऊन सर्वांच्या हातात हात घालून पक्षकार्य करावे. स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही त्यांनी आवाहन केले. दर एक-दोन महिन्याने जिल्ह्यात येऊन अडीअडचणी जाणून घेणार आहे. त्यावेळी तक्रारी, अडचणी सोडवल्या जातील; परंतु सर्वच कामे आमच्याकडून व्हावीत, अशी अपेक्षा न बाळगता तुमच्याकडूनही साथ मिळणे आवश्यक आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी समाजकार्यासह पक्षकार्य करून स्वत:ची ताकद दाखवली नाही तर तुम्हाला कोणी विचारणार नाही. ती ताकद आता निर्माण करूया, असे आवाहनही ना. पाटील यांनी यावेळी केले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:37 AM 15-Oct-21