अलिबाग पेण मार्गावर पळीनजीक आज पहाटेच्या सुमारास टेम्पो आणि टँकर यांच्यात झालेल्या अपघातात दोघेजण ठार झाले. गणेश कडू व निखिल पाटील अशी मृतांची नावे आहेत. तर गंभीर जखमी झालेल्या वैभव गवई याच्यावर कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर धेरंड येथील तरुणांनी गंभीर जखमींना बाहेर काढून अलिबाग जिल्हा रुग्णालयात हलवले, तेथे प्राथमिक उपचार करून कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात हलवले. परंतु गणेश व निखिल यांचा मृत्यू झाला. यातील मृत निखिल हा टेम्पो चालवत उरणहून अलिबागकडे निघाला होता. पेझारीच्या पुढे पळी इथं टेम्पो आला असता त्याला डुलकी लागली व टेम्पो समोरून येणाऱ्या टँकरवर आदळला. यात टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच धेरंड येथील मरीआई क्रीडा मंडळाचे खेळाडू तातडीने घटनास्थळी धावले व त्यांनी गंभीर जखमींना टेम्पोतून बाहेर काढून रुग्णालयात हलवले.
