गणपतीपुळे विकास आराखडा भूमिपूजन प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आ. भास्कर जाधव यांची नाराजी स्पष्टपणे दिसून आली. व्यासपीठावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आल्यानंतर आ. भास्कर जाधव व्यासपीठावर आले व मागील रांगेत बसले. ना. उदय सामंत यांनी विनंती केल्यावर त्यांनी पहिल्या रांगेतील शेवटच्या खुर्चीत बसणे पसंत केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सत्काराच्या वेळी खा. विनायक राऊत यांनी लांब असलेल्या भास्कर जाधव यांना जवळ आणण्याचा प्रयत्न केला मात्र भास्कर जाधव यांनी खा. विनायक राऊत यांचा हात झटकला. व्यासपीठावरील ही नाराजी उपस्थित सर्वांच्या नजरेत आली. कार्यक्रमानंतर आ. भास्कर जाधव यांनी पत्रकारांच्या प्रश्नांचे उत्तर देण्यास देखील टाळाटाळ केली.