‘हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचाच!’; मुख्यमंत्री फडणवीसांनी सभागृहात पुराव्यांसह केला ‘ठाकरे शैलीत’ पलटवार

मुंबई: राज्यात गाजलेल्या हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत विरोधकांना, विशेषतः उद्धव ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना फडणवीसांनी थेट मंत्रिमंडळाचे इतिवृत्त आणि उद्धव ठाकरेंची स्वाक्षरी असलेले पुरावेच सभागृहात सादर केले.

नेमका वाद काय होता?

निवडणुकीपूर्वी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठे आरोप-प्रत्यारोप झाले होते. भास्कर जाधव यांनी या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, हिंदी सक्तीचा पाया महाविकास आघाडी सरकारच्या काळातच रचला गेला होता.

फडणवीसांनी मांडलेली वस्तुस्थिती:

मुख्यमंत्र्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीचा घटनाक्रम सभागृहासमोर ठेवला:

  • टास्क फोर्सची स्थापना: २१ सप्टेंबर २०२० रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तज्ज्ञ समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १६ ऑक्टोबर २०२० ला डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली १८ सदस्यीय टास्क फोर्स तयार करण्यात आला.
  • समितीचे सदस्य: या समितीत सुखदेव थोरात, डॉ. राजन वेळूरकर यांच्यासह उद्धवसेनेचे उपनेते विजय कदम यांचाही समावेश होता. विशेष म्हणजे, १८ पैकी १६ सदस्य मराठी होते.
  • अहवाल सादरीकरण: १४ सप्टेंबर २०२१ रोजी या समितीने १०१ पानांचा अहवाल उद्धव ठाकरे यांना सादर केला. या शिफारशींवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश स्वतः ठाकरेंनी दिले होते.

अहवालातील धक्कादायक शिफारसी:

डॉ. माशेलकर समितीने भाषेच्या संदर्भात खालील शिफारसी केल्या होत्या:

  • पहिलीपासून हिंदी सक्ती: इंग्रजी आणि हिंदी भाषा ही दुसरी भाषा म्हणून पहिल्या वर्गापासून बारावीपर्यंत सक्तीची करण्यात यावी.
  • महाविद्यालयीन शिक्षण: गरज भासल्यास महाविद्यालयीन अभ्यासक्रमातही इंग्रजी व हिंदी सक्तीची करावी.
  • उद्देश: विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आणि तांत्रिक अभ्यासक्रमांसाठी सज्ज करणे हा यामागचा मुख्य हेतू होता.

‘करून करून भागले आणि देवपुजेला लागले’

फडणवीसांनी सभागृहात मंत्रिमंडळाचे इतिवृत्त दाखवत सांगितले की, २० जानेवारी २०२२ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या शिफारशींना मान्यता देण्यात आली होती आणि त्यावर उद्धव ठाकरे यांची सही होती.

“मंत्रिमंडळाने शिफारस स्वीकारल्यानंतरच आमच्या सरकारने जीआर काढला. पण सगळे तुम्ही केले आणि आता आम्हाला ठोकायचे? हा तर ‘करून करून भागले आणि देवपुजेला लागले’ असा प्रकार झाला,” अशा शब्दांत फडणवीसांनी टोला लगावला.


‘राज-उद्धव’ भेटीवरही टिप्पणी

या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचा उल्लेख करत फडणवीस मिश्किलपणे म्हणाले, “माझ्यामुळे दोन भाऊ एकत्र आले, याचे क्रेडिट मी आनंदाने घेईन”. मात्र, राजकीय विरोधासाठी वस्तुस्थिती लपवू नका, असा सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:34 26-02-2026