2024 मध्ये भाजपचा मुख्यमंत्री, तर 2029 ला मनसेचा मुख्यमंत्री लिहून घ्या : राज ठाकरे

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकांबाबत मोठं विधान केलं आहे. महायुतीकडून यंदाच्या विधानसभा निवडणुका ह्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढल्या जात असल्याचं सांगण्यात येतंय.

त्यामुळे, महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार, कोणत्या पक्षाचा होणार यावर सध्या कुणीही भाष्य करत नाही. मात्र, राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 2024 चा मुख्यमंत्री भाजपचाच होईल, असे म्हटले आहे. याशिवाय 2029 चा मुख्यमंत्री हा मनसेचा होईल, असे भाकितही राज यांनी वर्तवले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच, राजकीय वर्तुळात राज ठाकरेंच्या या विधानाने बॉम्ब टाकल्याचंही दिसून येत आहे.

विधानसभा निवडणुकांमध्ये यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होत आहे. मात्र, तिसरी आघाडी, मनसे आणि वंचित बहुजन आघाडी हे देखील पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत. मनसेनंही 100 पेक्षा अधिक जागांवर आपले उमेदवार उभे केले असून यंदा एकला चलो रे चा नारा दिला आहे. त्यामुळे, यंदाच्या निवडणुकीतील निकालाची सर्वांनाच उत्सुकता आहे. त्यातच, राज ठाकरे यांनी महाराष्ट्र व्हिजन या कार्यक्रमातून यंदाचा म्हणजेच 2024 चा मुख्यमंत्री हा भाजपचाच होईल, तर 2029 चा मुख्यमंत्री मनसेचा असेल, असे भाकीत केल्याने निवडणूक निकालापर्वीच राज ठाकरेंनी विधानभेचा निकालाच जाहीर केला असून हा आपला अंदाज असल्याचंही राज यांनी म्हटंलय. त्यामुळे, राज ठाकरेनी एकप्रकारे देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता असल्याचे सूचक विधान केलं आहे. तसेच, मनसेच्या पाठिंब्यावरच हा भाजपचा मुख्यमंत्री होईल, असेही राज यांनी म्हटले.

अमित ठाकरेंविरुद्ध महायुती

दरम्यान, अमित ठाकरेंविरुद्ध महायुतीने व महाविकास आघाडीने उमेदवार दिला आहे. त्यामुळे, उद्धव ठाकरेंनी देखील पुतण्या अमितविरुद्ध मैदानात ठाकरेंचा उमेदवार उतरवल्याचं स्पष्ट झालंय. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, अमित विरोधात माहीममध्ये उमेदवार देणे हा, हा प्रत्येकाचा स्वभावाचा भाग झाला आहे. प्रत्येकजण आपल्या स्वभावानुसार वागत असतो. भाजपसारख्या मॅच्युअर्ड पक्षांना ही गोष्ट कळू शकते, सगळ्यांनाच हे कळेल असं नाही. बाकी प्रत्येकाचे मिळेल ते ओरबाडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आपण कोणाला कुठे आणि किती सांगायला जाणार, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

मी शिवसेनेतून बाहेर पडलो, पक्ष फोडला नाही

राज्यात गत 5 वर्षात झालेल्या पक्ष फोडाफोडीच्या घटनेवरही राज यांनी परखड भाष्य केलं. शिवसेनेतून बाहेर पडलो, त्यावेळी मी पक्ष फोडला नाही. मला पक्षातूल इतर नेते फोडून पक्ष निर्माण करायचा नव्हता असे राज ठाकरे म्हणाले. मला वेळ लागला तरी चालेल असे राज ठाकरे म्हणाले. मी शिवसेनेतून बाहेर पडलो तेव्हा शक्य असूनही आमदार फोडले नाहीत. मग मला सत्तेत येण्यासाठी कितीही वेळ लागला तरी चालेल. मला अशाप्रकारे फोडाफोडी करुन कधीही सत्ता नको, असे राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. पण महाराष्ट्रावर आताच्या परिस्थितीतून बाहेर येईल. महाराष्ट्रावर खोलवर संस्कार झाले आहेत. यातून महाराष्ट्र बाहेर येईल. महाराष्ट्र खूप मोठा आहे. असे राज ठाकरे म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:22 30-10-2024