राजापूरमध्ये थरारक रेस्क्यू! ३५ फूट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याला अवघ्या ४ मिनिटांत जीवदान

राजापूर (जुवाठी): राजापूर तालुक्यातील जुवाठी शिर्केवाडी येथे एका खासगी विहिरीत पडलेल्या दीड ते दोन वर्ष वयोगटातील मादी बिबट्याला वन विभागाने अत्यंत कौशल्याने आणि वेगाने बाहेर काढले. केवळ ४ मिनिटांत राबवलेल्या या चित्तथारक रेस्क्यू ऑपरेशनमुळे या बिबट्याला सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात यश आले आहे.

नेमकी घटना काय?

बुधवार, १ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मौजे जुवाठी शिर्केवाडी येथील श्री. रामचंद्र नारायण भारती यांच्या मालकीच्या विहिरीत एक वन्यप्राणी पडल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. विहिरीची खोली सुमारे ३५ ते ४० फूट होती. ग्रामस्थांनी विहिरीत डोकावून पाहिले असता, एक बिबट्या पाण्यातील एका दगडावर जीव मुठीत धरून बसलेला दिसला. जुवाठीच्या पोलीस पाटलांनी तातडीने या घटनेची माहिती राजापूर वन अधिकाऱ्यांना दिली.

दोन तासांत वन विभागाची टीम घटनास्थळी

घटनेचे गांभीर्य ओळखून परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल, वनरक्षक आणि रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. बिबट्याला बाहेर काढण्यासाठी पिंजरा मागवण्यात आला. सकाळी ११ वाजता सर्व तयारी पूर्ण करून पिंजरा दोरीच्या साह्याने सावधगिरीने विहिरीत उतरवण्यात आला.

असे राबवले ‘क्विक रेस्क्यू ऑपरेशन’

  • साडेअकराची वेळ: पिंजरा विहिरीत सोडताच बिबट्याने संधी साधून त्यात प्रवेश केला.
  • विक्रमी वेळ: अवघ्या ४ मिनिटांत बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करून सुखरूप बाहेर काढण्यात आले.
  • वैद्यकीय तपासणी: राजापूरचे पशुधन विकास अधिकारी डॉ. वेर्लेकर यांनी बिबट्याची तपासणी केली. ही मादी बिबट्या सुदृढ असल्याचे स्पष्ट झाले.

नैसर्गिक अधिवासात मुक्तता: विभागीय वनअधिकारी (चिपळूण) श्रीम. गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक श्रीम. प्रियांका लगड आणि वनक्षेत्रपाल श्री. प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून, मादी बिबट्याला सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात आले.


या टीमने फत्ते केली मोहीम

या यशस्वी कामगिरीमध्ये वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार, वनपाल जयराम बावदाणे, वनरक्षक विक्रम कुंभार आणि रेस्क्यू टीममधील दीपक चव्हाण, निलेश म्हादये, नितेश गुरव, संदीप जाधव, साहील जांगळी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.

वन विभागाच्या या तत्परतेचे आणि ४ मिनिटांत राबवलेल्या यशस्वी मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 02-04-2026