२०२९च्या विजयाची तयारी आतापासूनच करा : भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त सोमवारी राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. २०२९च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील विजयाची तयारी आतापासूनच करा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईतील मेळाव्यात केले.

देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि पक्षाच्या विचारधारेविषयी विश्वासाचे, सकारात्मक वातावरण आहे. याचा योग्य वापर करून घेत, प्रत्येक बूथची जबाबदारी घेणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी पुढच्या स्थापना दिनाआधी भक्कम करू या, असेही चव्हाण म्हणाले.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार, कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा, प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, प्रदेश सरचिटणीस आ.निरंजन डावखरे, सुनील राणे, आ.योगेश सागर, आ.तमिल सेल्वन, आ.पराग शाह, आ.प्रवीण दरेकर, महापौर रितू तावडे, आ.प्रसाद लाड आदी उपस्थित होते. माजी मंत्री जगन्नाथ पाटील, ज्येष्ठ नेते मधू चव्हाण, लद्धाराम नागवाणी, दिलीप हजारे, अरुण मोरसावाला, शरद चव्हाण, श्रीपाद मुसळे, अविनाश दलाल आदी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

भाजपाच्या कार्यकर्त्याने मनात आणलं तर काहीच अशक्य नाही !

भाजपाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने आज चर्चगेट येथील के. सी. कॉलेजच्या सभागृहात भाजपाच्या सक्रीय कार्यकर्त्यांचे संमेलन पार पडले. यावेळी उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

कार्यकर्त्यांच्या घरावर झेंडे

राज्यातील भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांनी आज त्यांच्या घरावर पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त भाजपचा झेंडा लावला होता. सोशल मीडियावर या कार्यकर्त्यांनी तसा फोटो पोस्टही केला. रक्तदान शिबिरांसह विविध कार्यक्रम घेण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:49 07-04-2026