रत्नागिरी : हवामानातील बदलामुळे घटणारी उत्पादकता, वन्य प्राण्यांचा उपद्रव, मजुरांची समस्या यामुळे भात लागवडीखालील क्षेत्रात दिवसेंदिवस घट होऊ लागली आहे. गतवर्षी ७० हजार ७५२ हेक्टर क्षेत्रावर भातपिकाची लागवड करण्यात आली होती, या वर्षी मात्र ६६ हजार ८७५.५२ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली होती. गतवर्षीच्या तुलनेत ३ हजार ६९६.४८ हेक्टर क्षेत्रात घट झाली आहे.
त्यात आता अवकाळीने शेतकन्यातील उरलासुरला उत्साहही निघून गेल्याची भावना शेतकऱ्यांत आहे. जिल्ह्यात आंबा, काजू पिकामुळे खूप मोठी आर्थिक उलाढाल होत असली, तरी भात पीक हेच मुख्य पीक म्हणून ओळखले जाते. नाचणी पिकाची दुय्यम पीक म्हणून लागवड केली जाते. याशिवाय तृणधान्यात तूर, मूग, उडीद, कडधान्यात भुईमूग, काळेतीळ, सूर्यफूल लागवड केली जाते. जिल्ह्यातील काही प्रयोगशील शेतकरी शेतामध्ये विविध प्रयोग करीत विविध प्रकारच्या भाज्या, कलिंगड, झेंडू, ऊस पिकाची लागवड करून उत्पादन घेत आहेत. मात्र, हे प्रमाण अत्यल्प आहे.
वन्य प्राण्यांमुळे शेतीची नासधूस केली जात असून, त्यावर कोणत्या उपाययोजना केल्या जात नसल्यामुळे शेतीचे नुकसान होते. त्यातच शासनाकडून मोफत धान्य वितरण केले जात असल्याने, शेती करण्याची मानसिकताकमी झाल्याचेही कारण म्हणावे लागेल. कृषी विभागाकडून विविध उपाययोजना शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत आहेत. अधिकाधिक क्षेत्र लागवडीखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येत असताना नेमका उलटा परिणाम होत आहे. यावर्षी आता खरिपातील लागवड कापणीसाठी सज्ज आहे. मात्र, अवकाळी पावसाचे सातत्यही वाढत आहे. आशात शेती करण्याचा कल काहीसा ढळू लागला आहे.
शेतीसाठी मजुरांची कमतरता नवीन पिढीचा मजूर कामाकडे कल नसल्याने शेतीच्या कामांसाठी मजुरांची समस्या तीव्रपणे भेडसावत आहे. त्याचप्रमाणे, हवामानातील होणाऱ्या बदलाचा फटका पिकाला बसत असल्याने पिकासाठी केलेला खर्चही निघत नसल्याने होणारे आर्थिक नुकसान परवडत नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:09 PM 02/Nov/2024














