राजापूर : गेल्या काही दिवसांपासून तालुक्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट करत दिवसभरामध्ये कधीही कोसळणाऱ्या पावसाने भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. विजा पडून नुकसान होण्याचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या वादळी पावसामध्ये चुनाकोळवण येथे घर, दुकानांची पडझड होऊन सुमारे चाळीस हजारांचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे तालुक्यात सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. गेले महिनाभर वगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट करत कोसळणाऱ्या या पावसाने भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. भातशेती आडवी पडून भाताच्या लोंब्याने नव्याने कोंबही फुटले आहेत. त्यातून झालेल्या नुकसानीने शेतकरी राजा पुरता हताश झाला आहे. आंबोळगड, तुळसुंदे, गोठणेदोनिवडे, कोंडवे आणि हातिवले आरेकरवाडी अशा पाच ठिकाणी घरांवर वीज कोसळून नुकसान झाले आहे. विजेचा धक्का बसून काही व्यक्ती जखमी झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये घरांची पडझड होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या आठवड्यामध्ये वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या परतीच्या पावसामध्ये चुनाकोळवण येथे घरांची पडछाड होऊन नुकसान झाले आहे. त्यामध्ये चंद्रकांत पांचाळ यांच्या घराचे २२ हजार ६०० रुपये, शांताराम पाटणकर यांच्या दुकानाचे १४ हजार ४०० रुपये, अनिरुद्ध जाधव यांच्या घराचे २ हजार रुपये, संजय कांबळे यांच्या घराचे १ हजार रुपये अशा चाळीस हजार रुपयांच्या नुकसानीचा समावेश आहे.
विजेच्या खेळखंडोब्याने पाण्याचे हाल
पावसामध्ये विजेचा खेळखंडोबा नित्याचीच बाब झाली आहे. पावसामध्ये खंडित होणारा वीजपुरवठा कार्यान्वित होण्यासाठी लोकांना दोन-दोन दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याविना हाल होत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:01 PM 06/Nov/2024














